Monday, September 2, 2019

राजा कृष्णदेवरायांची “हंपी” – भाग २ रा...

राजा कृष्णदेवरायांची “हंपी” – भाग २ रा...


     


दिवस ३ रा – होस्पेट ते हंपी प्रवास आणि हंपी दर्शन ...

      सर्वचजण हंपीला जाण्यासाठी उत्सुक तर होतेच, सर्वांनी सकाळी लवकर उठून तयारी केली आणि हॉटेलमधला उत्कृष्ट असा दाक्षिण्य पद्धतीच नाश्ता उरकून हंपीकडे प्रस्थान सोडले, अगदीच १० ते १५ मिनिटांत “विजयनगर साम्राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहे” असा फलक नजरेसमोर दिसला, त्याअगोदर एका धरणाच्या भिंतीवर थांबून थोडेसे फोटोसेशन उरकून घेतले, समोर विस्तीर्ण पसरलेली केळीची बाग आणि ऊसपट्टा लक्ष वेधून घेत होता, वातावरणात आल्हाददायक गारवा होताच आणि दक्षिणेकडचा दमटपणा देखील. बाईकर्सना “विजय विठ्ठल” मंदिरापाशी भेटण्याची सूचना आधीच दिलेली होती परंतू डॉक्टर साहेबांच्या बुलेटने सकाळी चालू होण्यास सपशेल नकार दिला आणि त्यांची धावपळ चालू झाली, सगळी सर्वेशची कमाल अन धमाल. साधारण २० मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही मंदिर परिसरात येवून पोहोचलो, वाटेत एक वैशिष्ट्यपूर्ण कमान दिसली. मंदिराच्या अलीकडेच एक किमी अंतरावर वाहनतळ आहे, तिथून पुढचा प्रवास पायी चालत किंवा प्रदूषण विरहीत वाहनाने करावा लागतो. आम्ही अर्थातच पायी जाण्याचे ठरवले, १५ मिनिटांच्या पायपिटीनंतर समोर विजय विठ्ठल मंदिर संकुल दिसले. तिकिटे काढून तडक आत गेलो, मंदिर प्रांगण इतकं विस्तीर्ण आहे की काय पाहू अन काय नको असं होतं, समजत तर काहीच नाही. आम्ही माहितगार व्यक्ती घेतली, आनंद त्याचे नाव. मितभाषी, संयमी आनंदने आम्हास संपूर्ण मंदिराचा इतिहास प्रात्यक्षिकासहित सांगितला. मंदिराचे प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पहिल्यांदा आपणास दिसतो तो गरुडरथ ज्यास भारतीय रिजर्व बँकेने आपल्या रुपये ५० च्या चलनी नोटेवर चित्रित केलेले आहे. विठ्ठलाच्या आरतीमधले “गरुड हनुमंत पुढे उभे राहती” तोच हा गरुडरथ. रथाची चारही चाके काही वर्षांपूर्वी फिरत्या अवस्थेत होती, परंतु पुरातत्व विभागाने त्याची झीज होवू नये म्हणून त्यांस स्थानबद्ध करून ठेवलेली आढळतात. गरुडरथाची माहिती घेवून इथं मनसोक्त फोटोसेशन करून घेतले. 







      विजय विठ्ठल मंदिराचा मुख्य गाभारा आजमितीला विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्तीविना सुनासुना आहे कारण, इथला विठूराया आमच्या महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये विसावला आहे. सुरेश भटांच्या अभंगांमध्ये त्याच हे विलोभनीय वर्णन आढळते, “कानडा राजा पंढरीचा”. बहामनी सुलतानांच्या आक्रमणांनी हा प्रदेश उध्वस्त होत असताना इथल्या मुख्य पुजाऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सुरक्षितपणे पंढरपूर येथे आणून त्यंची प्रतिस्थापना केली. यावरही बरेचसे मतभेद आहेत, असो. या मंदिराचा सभामंडप ५६ खांबांवर उभारलेला असून त्यातील काही खांब हवेत तरंगते आहेत. याच सभामंडपात राजा कृष्णदेवरायाचा दरबार भरत असे. दरबाराचे काम संपल्यावर इथं राजासाठी मैफल होत असे. या सभामंडपाच्या ५६ खांबावर वादक विविध तंतुवाद्ये वाजवीत असत, किती अद्भुत! कालांतराने आपल्या भारतावर इंग्रजांनी हुकुमत गाजवली, त्यादरम्यान या मंदिराचा एक खांब कापून इंग्रजांनी अभ्यासासाठी लंडनला नेला व त्या दिवसापासून इतर ५५ खांबांमधील तंतुवाद्यांचे आवाज बंद झाले ते आजतागायत बंदच आहेत. आनंदने बऱ्याच गोष्टी इतक्या बारीकपणे समजावून सांगितल्या की त्या ऐकतच राहावे असे वाटत होते. वेळ मर्यादित असल्यामुळे विठ्ठलाच्या पायाशी नमस्कार ठेवून इथून पुढच्या टप्प्यावर जाण्याचे ठरवले व काढता पाय घेतला. मी आजवर भेटी दिलेल्या ठिकाणांमधील सर्वोत्तम असे ठिकाण आज पाहण्यात आले. मंदिराच्या प्रत्येक खांबावरील कलाकुसरीची माहिती लिहिणे शक्य नाही, पण ती पाहताना आश्चर्य मात्र नक्की वाटते.


आता परत हंपी शहराकडे प्रस्थान ठेवून पुढची अजून काही विस्मरणात गेलेली ठिकाणे पहायची होती. इकडेही आम्हाला एका माहितगार माणसाची आवश्यकता होती, त्याची जागा “अली” नावाच्या एका मुस्लीम तरुणाने ती भरून काढली, सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हा तरुण मुस्लीम असूनसुद्धा हिंदू संस्कृतीचा त्याचा प्रचंड मोठा अभ्यास होता. अलीने आम्हास ४ महत्वाची ठिकाणे तसेच त्यांची इत्यंभूत माहिती देण्याचे आश्वासन दिले. क्वीन्स बाथ, होळीचा माळ, हजार राम मंदिर आणि शेवटी विरुपाक्ष मंदिर...

१.      क्वीन्स बाथ – आजकालच्या स्विमिंग पूलसारखाच परंतू आखीव रेखीव संकुल जे त्याकाळी राणीवश्याच्या अंघोळीसाठी बांधलेला एक महालच जणू. दोनमजली चार विस्तीर्ण खोल्या, बरोबर मध्ये राण्यांच्या अंघोळीचा तलाव, दासींच्या वेगळ्या खोल्या, अबब. त्या अंघोळीच्या तलावात साधारण १५ किमी अंतरावरील तुंगभद्रा नदीच्या पात्रातून एका बंदिस्त कालव्याद्वारे स्वच्छ पाणी यायचे. आज तो बंदिस्त कालवा पडझड झाल्यामुळे बंद पडलेला आहे.

२.      होळीचा माळ – एकूण ५० एकरपेक्षा जास्त जमिनीवर पसरलेला होळीचा माळ म्हणजेच राजा कृष्णदेवरायाचा महाल, राजदरबार, गुप्त बैठकांसाठी जमिनीच्या खाली असणाऱ्या खोल्या, वैशिष्ट्यपूर्ण अशी पायरी विहीर, जनता दरबारासाठी वेगळी जागा व होलिका उत्सव साजरा करण्यासाठीचा वेगळा माळ. आजमितीला इथली एकही वास्तू अस्तित्वात नसली तरीही त्यांची भव्यता नजरेत मावत नाही. या संपूर्ण जागेला एक बृहदमोठी अशी तटबंदी होती तसेच पूर्वाभिमुखी प्रवेशद्वाराचे दरवाजे काळ्या पाषाणांनी बनलेले होते. हे दरवाजे सकाळच्या प्रहरात चार हत्तींच्या सहाय्याने उघडले जायचे व सायंकाळच्या प्रहरात बंद केले जायचे. आजही सदर दरवाजे तिथे आडवे पडलेले आढळतात. होळीच्या माळावर प्रवेश केल्यावर आमचा बाईकर्स चमू आम्हास परत येवून मिळाला. संपूर्ण होळीचा माळ पाहायला साधारण दोन तासांचा अवधी लागतो पण आम्ही पटपट तो पाहून घेतला आणि पुढच्या वास्तूकडे कूच केले. वाटेत काळ्या पाषाणात तयार केलेली जेवणाची ताटे पाहण्यात आली तसेच दोन नंदी ज्यांच्यातून तंतुवाद्यांचे आवाज निघतात, अर्थात त्यासाठी आपल्याला आपले कान त्यावर लावावे लागतात. सारे काही अद्भुत आणि तितकेच विलोभनीय. काही वर्षांपूर्वी या परिसराला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केल्यानंतर थोडे खोदकाम तथा शोधकार्य हाती घेतले होते. त्याच खोदकामात जमिनीत गाडली गेलेली पायरी विहीर सापडलेली आहे. याही विहिरीत तुंगभद्रेच्या पात्रातून खुल्या कालव्याद्वारे पाणी आणलेले आढळते. ही विहीर त्याकाळी बारमाही असायची व नंतरच्या काळात पाणी येणे बंद झाल्यामुळे ती जमिनीत लुप्त पावली गेलेली होती.

३.      हजार राम मंदिर – प्रभू रामचंद्र अयोध्येतून १४ वर्षांच्या वनवासाला निघाल्यापासून ते शबरीची बोरे, लक्ष्मणाचे बंधुप्रेम, रावणाने सीतामातेचे केलेले अपहरण, जटायूचे रावणाशी युद्ध, जांबुवंत आणि हनुमान सेनेचे लंकेवरील आक्रमण आणि सीतामातेची सुटका असे संपूर्ण रामायण इथल्या भिंतीवर सुमारे एक हजार शिल्पांमध्ये कोरलेले आहे. म्हणूनच या मंदिरास हजार राम मंदिर संबोधले जाते. या शिल्पांची भव्यता पाहताक्षणीच डोळ्यांत भरतेच, परंतू रामायण सुद्धा डोळ्यांसमोर तरळते. राजा कृष्णदेवराया इतका मोठा रामभक्त होता की त्याने त्याकाळी इतके सुंदर शिल्प घडवले व हा वारसा आज आपल्यासाठी उपलब्ध आहे.

विरुपाक्ष मंदिर – हंपी आणि परिसरातील एकमेव मंदिर जिथे पूजापाठ आणि धर्मकार्ये चालू आहेत असे हे विरुपाक्ष मंदिर होय. विरुपाक्ष देवता महाविष्णू अवतार मानली जाते. मंदिराचा गोपूर पाहताक्षणीच मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असल्याचे जाणवून देतो. गोपुराचा रंग सोनेरी असून मावळतीची सूर्यकिरणे त्यास अजून सोनेरी करतात. हेही मंदिर बहामनी सैन्य उध्वस्त करण्यासाठी निघाले असता साक्षात विष्णूंचा अवतार असलेल्या वराहांचा एक मोठा घोळका त्या सैन्याच्या आडवा आला. आता वराह हे मुस्लिमांमध्ये निषिद्ध मानले जाते म्हणून त्यांनी विचार बदलला आणि एक मंदिर उध्वस्त होण्यापासून वाचले. विरुपाक्षाची मूर्ती पुरातन तर आहेच पण बाहुबली अवतारात दिसते, पाहताक्षणीच ती जागृत असल्याचा भास झाल्यावाच्यून राहत नाही. मंदिराला साधारण ५० हून अधिक रेखीव खांब आहेत ज्यावर हेमाडपंथी कलाकुसर साकारण्यात आलेली आहे. कलाकुसरीत वापरलेले रंग आजही जसेच्या तसे सजीव वाटतात.








विरुपाक्ष मंदिर पाहून झाल्यावर आता वेळ होती या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहण्याची, त्यासाठी मंदिराच्या मागच्या बाजूच्या टेकडीवर गेलो. आधीच तिथं बऱ्याच हौशी देशी-विदेशी लोकांनी आपापल्या जागा धरून बसलेले दिसले, पाठीमागे वळून पाहिले असता विरुपाक्ष मंदिराचा गोपूर मावळतीच्या किरणांनी शुभ्र सोनेरी रंगात न्हावून निघालेला दिसला. थोड्याच वेळात सूर्यास्त झाला, मनसोक्त फोटो सेशन उरकून घेवून टेकडीच्या खालच्या बाजूस स्थित गणेशाचे दर्शन घेवून आजच्या विलोभनीय दिवसाचा समारोप केला. संध्याकाळी हंपीनजीक एका गावात जावून रात्रीच्या मुक्कामाची सोय पाहिली, ३१ डिसेंबर जो साजरा करायचा होता. बेत खूप छानपणे जमून आला, डॉक्टर आणि त्यांचा गिटार व कराओके आणि त्यांच्याच सुमधुर आवाजातील गायलेली गाणी. माझ्याकडे भट्टीवर चिकन फ्राय करण्याची जबाबदारी आली आणि तीही मी लीलया पेलून नेली. रात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास केक कापून नवीन वर्षाचे स्वागत केले व २०१८ वर्षास निरोप दिला व मोकळ्या मैदानात ठोकलेल्या तंबूंमध्ये शिरून निद्रादेवीस अधिष्ठान घातले.







१ जानेवारी २०१९ चा दिवस उजाडला अगदीच सकाळी सकाळी जाग आली. इतर भिडूंना जागे केले, थोडेसे फ्रेश होवून दाक्षिणात्य इडली सांभार, ओम्लेटवर आडवा हात मारून घेतला व विनाविलंब सामान गाडीत भरले व परतीच्या प्रवासासाठी गाडीचे स्टीअरिंग ताब्यात घेतले, बाईकर्स भिडूंचा निरोप घेतला आणि परतीचा प्रवास आरंभला. येताना इल्कल, मुधोळ, निपाणी व कोल्हापूर येथे विश्रांती घेवून रात्री ११:०० च्या दरम्यान पुणे येथे सुंदर आठवणींचा खजिना मनात साठवून पोहोचते झालो.

बादामी, पट्टडकल, आयहोळे, होस्पेट आणि शेवटी हंपी ही सहल बाईक राईड किंवा कार ड्राईवने वर्षभरात कधीही करता येते, शक्यतो उन्हाळ्याच्या चार महिन्यात गर्मीचा त्रास सहन करत करावी लागते. जाताना मनाशी एक गोष्ट ठाम करून घ्यावी की आपण नास्तिक नाही आहोत, नाहीतर ही सर्व मंदिरे नाही पाहता येत. संपूर्ण अंतरात जेवणाच्या आणि वाजवी दरात मुक्कामाचे बरेचशे पर्याय उपलब्ध आहेत. बादामीमध्ये देवीच्या पूजेचे कुपन असेल तरच आपणास भक्तनिवासात राहता येते. संपूर्ण प्रवासादरम्यान आपण कर्नाटक आणि काही वेळासाठी तेलंगाना राज्यात जातो त्यामुळे मराठी खाद्यपदार्थ निवडक ठिकाणीच मिळतात. 

आज इतकच, भेटू लवकरच अशाच दर्जेदार भटकंती आणि प्रवास वर्णनांसहित ... 

तोवर सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय !!



सहभागी भिडू – डॉक्टर धुमाळ साहेब आणि त्यांची निसान टरेनो व बुलेट, देवा घाणेकर, सर्वेश धुमाळ, राहुल आणि पिया सावंत, खुशी, चैतन्य पंचपोर आणि मी टरेनोचा सारथी अभिजीत शिंदे. सर्वांचे मन:पूर्वक आभार...



संपूर्ण फोटो’ज पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा... धन्यवाद!!!


https://photos.app.goo.gl/kwzqurtLx9d1UabR6

Thursday, April 4, 2019

“ कासव महोत्सव २०१९ – वेळास, रत्नागिरी ”

कासव महोत्सव २०१९वेळास, रत्नागिरी


या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे !!
या ओठांनी चुंबून घेईन हजारदाही माती !
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी !
५० वर्षांचे आयुष्य माझे पुनश्च: स्मरावे!
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे !!

ऑलिव्ह रिडले टर्टल” या आजघडीला इतर प्रजातींच्या तुलनेत भरपूर प्रमाणात आढळणारी परंतु धोक्यात असणाऱ्या या कासवांच्या प्रजातीच्या जीवनचक्रास तंतोतंत लागू पडतील अशा या ओळी. सुदैव इतकच ती अजून लोप पावलेली नाही, त्याला कारण ठरलेत वेळास ता. मंडणगड, जि. रत्नागिरी गावचे सजग नागरिक! या गावकऱ्यांच्या कासव संवर्धन कार्यक्रमास आणि प्रयत्नास वनखात्याने देखील पाठबळ आणि संरक्षण दिले आहे. इसवी सन २००२ पासून या गावच्या नागरिकांनी “कासव संवर्धन” कार्यक्रम हाती घेतला आणि आज त्या कार्यक्रमास एक बहारदार अशा महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या गावाकडे कधीही कमी संख्येने येणाऱ्या पर्यटकांची संख्या आता भरपूर वाढली आहे. स्थानिक लोकांच्या हातांस काम मिळाले आहे, इथल्या खाद्य संस्कृतीची ओळख इतर ठिकाणच्या लोकांस होवू लागली आहे आणि इथल्या लोकांचे एकूणच जीवनमान उंचावले आहे. साल २०१९ चा हा कासव महोत्सव पाहण्याचे आमच्या चमूने ठरविले आणि #IndiaTreks या संस्थेने नियोजनाची जबाबदारी घेतली, अर्थातच मीही त्या टीममध्ये होतोच, तारीख ठरली २३ आणि २४ मार्च २०१९.

२३ मार्च हा छत्रपती शिवरायांच्या तिथीप्रमाणे जयंतीचा दिवस, जगातला एकमेव महान आणि लोकाभिमुख राज्यव्यवस्था म्हणजेच “स्वराज्य” निर्माण करणारा हा राज्यकर्ता तारीख आणि तिथीच्या घोळात अडकलेला किंवा अडकवला गेलेला, असो! शुक्रवारच्या संध्याकाळी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला बीभत्सपणे आरडाओरडा करत टुकार तरुणांची निघालेली मोटारसायकल, आणि इतर वाहनांची फेरी दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वर्गातून पाहिली असेल तर महाराज नक्कीच म्हणाले असतील, या नालायकांसाठी का आम्ही तलवारी उपसल्या अन स्वराज्यनिर्मिती केली काय? आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले आणि आमच्या प्रवासाची आखणी केली, कारण पुढे जावून वेळासमध्ये अतिशय पारंपारिक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा शिवजयंती उत्सव आम्हास पहावयास मिळणार होता. रात्री ११ च्या सुमारास आमच्या गाडीने स्वारगेट सोडले आणि ताम्हिणी घाट मार्गाने माणगाव इथं जाण्यासाठी प्रस्थान सोडले. वाटेत इतर सहकारी भिडूंना गोळा करत मध्यरात्री ३ च्या सुमारास गाडी माणगाव इथं पोहोचली. इथं आम्हास आमचा सह्यभिडू विशाल येवून मिळणार होता. विशाल आला आणि सीटांची थोडी अदलाबदल करून गाडी वेळासकडे मार्गस्थ झाली. तीन तासांच्या प्रवासानंतर भल्या पहाटे आम्ही वेळास इथं दाखल झालो. गाडी पोहोचण्यास तसा थोडा उशीर मात्र नक्कीच झाला होता, कारण प्रगतीशील महाराष्ट्रातल्या रस्त्यावर पडलेले सर्वदूर असे खड्डे, कंबर मोडायची फक्त राहिली होती.


थोडेसे “ऑलिव्ह रिडले” कासव या समुद्री जीवाविषयी... 

जीवशास्त्रीय दृष्ट्या कासवांच्या १० प्रजाती जगभर अस्तित्वात आहेत, पैकी ७ प्रजातींचे माहेरघर आपला भारत देश आणि इथला विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. बहुतांश कासवाच्या प्रजाती या उष्णकटिबंधीय समुद्रात राहतात, उदा. हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर. या ७ प्रजातींपैकी “ऑलिव्ह रिडले” या जातीच्या कासवांचे माहेर म्हणजे कोकणातील वेळास आणि इथला १० किमी लांबीचा समुद्रकिनारा, किती अद्भुत ना. जन्मताना २ ते २.५ सेमी लांबीरुंदीचा हा समुद्री जीव पूर्ण वाढ झाल्यावर २ ते २.५ फूट लांबीचा आणि ३५ ते ४० किलो वजनाचा होतो. या प्रजातीच्या कासवांचे एकंदर आयुष्यमान हे ५० वर्षांचे असते, काही प्रजातींचे आयुष्यमान तर ३५० वर्षांपर्यंत असल्याचे जीवशास्त्र सांगते. ५० वर्षांपैकी पहिली १५ वर्षे तारुण्य आणि प्रजननक्षम होण्यासाठी लागतात. कासवांसाठी आयुष्याच्या पहिल्या ३ वर्षांचा काळ हा अतिशय खडतर मानावा लागेल कारण पहिल्या ३ वर्षांत जगण्याची हमी नसते. जिथं जन्माची हमी नाही, तिथं जगण्याची हमी कोण देणार किंवा घेणार! या कासवांचे अन्न हे मुख्यत्वे करून मांसाहार असतो, त्यामध्ये सर्व प्रकारचे छोटे समुद्री जीव, जेलीफिश, गोगलगायी, खेकडे आणि शिंपले. कधीकाळी ही कासवे समुद्री शेवाळ आणि समुद्रातील झाडांच्या सालीसुद्धा खातात. आजच्या तारखेला साधारण ८००,००० (आठ लाख) प्रजननक्षम कासवे पृथ्वीतलावर जिवंत आहेत, काही वर्षांपूर्वी हीच संख्या किमान चार पट असावी.






ऑलिव्ह रिडले कासवांचा विणीचा हंगाम वर्षभर असतो परंतु मादी वर्षातून एकदाच समुद्र किनाऱ्यावर वाळूत घरटी करून त्यात अंडी घालते. एकावेळी एका घरट्यात मादी साधारण १०० च्या आसपास अंडी घालते. कासवांचा जन्मदर जरी अधिकचा असला तरी त्यांचा मृत्युदर खूपच मोठा आहे. सरासरी १०० कासवांमागे ५ ते १० जिवंत राहतात आणि आपले पूर्ण आयुष्य जगतात, सर्वच प्रजातींच्या बाबतीत लागू होणारा आणि आपणास चिंतेत टाकणारा हा दर आहे.

म्हणूनच, वेळास गावच्या नागरिकांचे करावे तितके कौतुक कमीच पडणार आहे. त्यास कारण की, २००२ सालापासून या लोकांनी कासव संवर्धनाचा वसा घेतला आणि तो आजही निरंतर चालू ठेवलाय. पहाटे ३ किंवा ४ वाजता उठून अथांग पसरलेल्या सागर किनाऱ्यावर गस्त घालत फिरणे, अंडी घालण्यासाठी आलेल्या मादीवर लक्ष ठेवून तिस नैसर्गिकरित्या अंडी घालू देणे आणि अंडी घालून झाल्यावर तिस समुद्रात परतेपर्यंत लक्ष ठेवणे. घरट्यातील अंडी सुरक्षितपणे एका जागी जमा करून त्यांस योग्य उब मिळेल इतक्याच खोलीवर गाडून ठेवणे, संपूर्ण ५० दिवस त्यावरही लक्ष ठेवणे आणि सरतेशेवटी जन्माला आलेल्या प्रत्येक कासवास त्याच्या हक्काच्या घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था करणे हे सोप्प काम नाही बरे. दरवर्षी हजारो कासवे हकनाक बळी पडत होती, त्यांची संख्या आता तुलनेने खूप कमी झालेली आढळते, हेच या संवर्धन कार्यक्रमाचे फलित. वेळास गावच्या कासव संवर्धन कामात लक्ष घालणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे जाहीर आभार आणि शुभेच्छा!!


भल्या पहाटे गाडीने बाणकोट पासून अथांग पसरलेल्या समुद्र किनाऱ्यावरील रस्त्याने ५० एक घरे असलेल्या “वेळास” मध्ये प्रवेश केला. बस थांब्याच्या एका बाजूस कट्ट्यावर बसलेल्या पुलंच्या “अंतू बर्वा” वजा आजोबांनी काही विचारण्याच्या आत सरळ तिकडे जा, कासवे सोडण्याची वेळ झालेली आहे असे सांगितले. आम्हाला काही विचारायचे आहे, यास केराची टोपली दाखविली. आम्ही कोकणात आल्याचे त्या काकांनी क्षणात दाखवून दिले. आम्हीही पक्के चेले त्यांचेच, दुसरा प्रश्न न करता तडक गाडी अंदाजे एक किमी लांब असलेल्या पुलापाशी नेवून थांबवली. सर्वांना खाली घेत समुद्राकडे कूच केले, काही लोकं जरूर थकले होते. १० मिनिटे चालत पायवाटेने गेल्यावर आपणास समोर अथांग समुद्र आणि त्यावरून वाहणाऱ्या गारगार वाऱ्याचा अनुभव घेता येतो. इथल्या समुद्राची वाळू ही सफेद रंगाची नसून तीस भुरकट काळा रंग लाभलेला आहे. आज समुद्राला ओहोटी आली होती त्यामुळे पाणी दूरवर लोटले गेले होते. किनाऱ्यापासून काही अंतर अलीकडे एक संरक्षित केलेला चौक दिसला, ज्यात ५ घरटी करून ती बांबूच्या टोपलीने तारीखवार झाकून ठेवलेली होती, जेणेकरून रात्री अपरात्री घरट्यातून बाहेर पडलेले कासव भरकटून जावू नये. आजूबाजूला लोकही जमा झालेले होते अन प्रत्येकजण उत्सुक होता तो नवजात कासवे पाहण्यासाठी.




वनकर्मचारी आणि तिघे स्थानिक आले, सोबत काही संस्थांचे स्वयंसेवक सुद्धा होते. चौकाचा दरवाजा उघडून आत गेले तसे लोकांनी आपापले कॅमेरे चालू करून पहिला फोटो आपणच टिपायचा म्हणून तयारी केली होती. कर्मचारी लोकांनी काही सूचना सांगितल्या व त्यांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करा असा विनंतीवजा सज्जड दम भरला. हा दम भरणे खरंच गरजेचे असते, नाहीतर हौशी पर्यटक फोटो काढण्याच्या नादात त्या कासवांचा जीवसुद्धा घेतील इतके उतावीळ झालेले असतात. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती, इतकी की माझा कॅमेरा चौकाची भिंत ओलांडून आतमध्ये झाकोळत होता. पहिली टोपली उघडली गेली, घोर निराशा पदरी पडली, एकही कासव दिसले नाही. दुसरी टोपली उघडली गेली, परत तेच, घोर निराशा पदरी पडली, एकही कासव दिसले नाही. तिसरी टोपली उघडली गेली आणि टाळ्यांचा कडकडाट, किमान १० कासवे आपल्या हक्काच्या घराकडे कूच करण्यासाठी उत्सुक होती. लहान मुलांनी तर अक्षरश: ओरडून त्यांचे स्वागतच केले जणू! मीही मनोमन त्यांस म्हटले, तुम्ही सुरक्षित आहात आणि तुम्हाला तुमच्या घरी जाताना पाहण्यास आम्हाला अत्यानंद होत आहे. कर्मचारी लोकांनी सर्व कासवे सुरक्षितपणे उचलून एका टोपलीत ठेवून दिली. आता वेळ होती चौथ्या टोपलीची, चौथी टोपली उघडली गेली, परत तेच, घोर निराशा पदरी पडली, एकही कासव दिसले नाही. आता मात्र पाचवी आणि शेवटची टोपली शिल्लक होती. ती उघडता क्षणी परत टाळ्यांचा कडकडाट आणि नवजात कासवांचे पृथ्वीतलावर लोकांनी केलेले स्वागत, खरेच हे क्षण जगून घेण्यासाठीच असतात. या टोपलीखाली किमान १५ कासवे होती, त्यांनादेखील एका टोपलीत भरले आणि समुद्राकडे प्रस्थान ठेवले.

आता वेळ होती, कासवांना नैसर्गिकरित्या वाळूवरून झेपावताना पाहण्याची आणि त्यांस लागलेल्या त्यांच्या घराच्या ओढीची. एकेक करून त्या लोकांनी कासवांना वाळूवर ठेवले, आणि पाहतो काय, प्रत्येक एका कासवाने अगदी समुद्राच्या दिशेने अचूक झेप घेतलेली पहावयास मिळाली. काय ती ओढ अन काय तो उत्साह, सार काही स्तब्ध करणारं, तितकच अद्भुत देखील. इतक्या छोट्याशा जीवाच्या डोळ्यात देखील आपल्या घरी जाण्याची ओढ स्पष्ट दिसत होती, अर्थात त्या संवेदनशिलतेने पाहिले तर. साधारण १५ मिनिटांच्या चालीने सर्व कासवे एकापाठोपाठ एक अथांग समुद्राच्या कवेत जावून विसावली होती. डोळ्याचे पारणे फेडणारे हे दृष्य मनात साठवून आणि कासव गाणं गुणगुणत आम्ही समुद्रावरून काढता पाय घेतला...




काही वेळातच, घरी पोहोचून शुभश्च-शुचिर्भूतम होवून लगेच पाटील मावशींनी केलेले गोड पोहे आणि उपमा खावून घेतला. लगोलग किल्ले “बाणकोट” पाहण्यासाठी प्रस्थान सोडले. बाणकोट किल्ल्याचे नाव किल्ल्याच्या खालील गावाच्या नावाचा अपभ्रंश असल्याचे आढळते, गावाचे मूळ नाव इतिहासात “बावनकोट” असल्याचे आढळते. या किल्ल्यास परिचित असा कोणत्याही लढाईचा इतिहास नसून या छोटेखानी किल्ल्याच्या वापर मुख्यत्वे करून हरिहरेश्वर ते महाड पर्यंतच्या सावित्री नदीतील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी झालेला आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे मातब्बर सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकून घेवून अजिंक्य ठेवला. तत्पूर्वी या किल्ल्यावर पोर्तुगीज, सिद्दी जौहर आणि आदिलशाही सुलतानांच्या राजवटी असत. त्याचे एक द्योतक असे की, आजही बाणकोट गावातील बहुतांश लोकं हे मुस्लीम धर्मीय आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोर्तुगीज काळाची ओळख सांगणारी तोफ असून ती सुस्थितीत आहे, किल्ल्याच्या बहुतांश भागाची पडझड झालेली असून आजमितीला या किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे. किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावर आपणास दोन्ही बाजूस बुरुज दिसतात, ज्यावर छोटेखानी टेहळणी मनोरे आहेत आणि तिथून समुद्रावरच्या होड्या आणि सावित्री नदीचा संगम स्पष्टपणे दिसतात. किल्ल्याच्या आतील भागात एक छोटी विहीर, कैदी ठेवण्यासाठी कोठडी आणि चोरवाट आहे. हा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला सुमारे एक तासाचा अवधी पुरेसा आहे. किल्ला पाहून झाल्यावर परतीच्या प्रवासाची वाट धरली. वेळासला पोहोचून पाटील आजीबाईनी बनवलेल्या कोकणी पद्धतीच्या मासे आणि खेकड्यांचे जीवन सार्थकी लावायचे होते.








परत येवून पाहतो तर काय, खेकड्यांची कढी आणि माश्यांच्या कालवणाचा सुगंध अक्ख्या घरात पसरला होता. सुरुवातीला घासफूस खाणाऱ्या लोकांना जेवू घातले आणि नंतर एकसाथ मांसाहारी लोकांनी स्वयंपाकावर आडवा हात साफ केला, काही वेळापूर्वी भरलेली कालवणाने भरलेली पातेली, चपात्यांनी भरलेल्या टोपल्या रिकाम्या झाल्या अन आजूबाजूला पसरलेले होते ते माशांचे काटे आणि खेकड्यांच्या पेट्या. अहाहा... एवढं सगळं खावून झाल्यावर शरीर थकणे स्वाभाविक होते आणि त्यास आता विश्रांतीची गरज होती. सर्वांनी सावलीखाली जागा पाहून पथाऱ्या पसरल्या आणि निद्रादेवीस अधिष्ठान घातले. मीही झोपी जाण्याच्या विचारात होतोच, तोवर काही पारंपारिक वाद्यांचा आवाज कानात घुमला, रस्त्यावर येवून पाहिले तर डोळ्यांसमोर एक छोटेखानी मिरवणूक तरळली. एका हातगाडीवर छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवलेली होती, तीस फुलांच्या हारांची आरास घालण्यात आलेली होती, आजूबाजूला पारंपारिक वेशभूषेत दिसणारे मावळे, शस्त्रास्त्रे ज्यामध्ये दांडपट्टा, काही तलवारी मांडल्या होत्या. गावाच्या मधल्या रस्त्यावरून ही मिरवणूक येत होती आणि प्रत्येक घरासमोर थांबत होती. त्या त्या घरांतल्या सुवासिनी पंचारतीचे ताट घेवून महाराजांचे औक्षण करत होत्या, आबालवृद्ध मंडळी महाराजांच्या नावाचा जयघोष करीत ही मिरवणूक चालली होती. आजच्या दिवसातील हे दुसरे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृष्य होते, वेळास गावच्या गावकऱ्यांनी दुसऱ्यांदा आमची मने जिंकली होती, आणि खुद्द शिवरायांनीसुद्धा या ग्रामस्थांना स्वर्गातून भरभरून आशीर्वाद दिले असतील. मनोमन शिवरायांना वंदन करून मीही थोडी विश्रांती घेतली.

            निश्चयाचा महामेरू | बहूत जनांसी आधारू |
            अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||

            यशवंत कीर्तिवंत | सामर्थ्यवंत वरदवंत |
            पुण्यवंत नीतिवंत | जाणता राजा ||

            या भूमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही |
            महाराष्ट्रधर्म राहिला काही | तुम्हा कारणे ||


आजच्या सायंकाळी “समुद्रमंथन” करायचे होते, अर्थात मिळणार तर काहीच नव्हते, ना विष ना अमृत. जवळजवळ एक तास सगळे समुद्राच्या लाटांवर स्वार होवून नुसता धिंगाणा घालत होते, एक गोष्ट नक्की की, इथल्या गावांवर निसर्गाची मेहेरनजर आहे. इथले समुद्र किनारे स्वच्छ आहेत, समुद्राचे पाणी देखील स्वच्छ आहे. जवळपास दोन तास डुंबून झाल्यावर सूर्याने आजच्या दिवसाचा निरोप घेतला, मनभावन असा सूर्यास्त पाहून घरी परतलो आणि गोड्या पाण्याची अंघोळ केली. आई गं, काय सांगू समुद्राची वाळू कुठे कुठे जावून बसली होती. लगोलग आवरून घेतले आणि संध्याकाळच्या जेवणाच्या माध्यमातून अनेक कोंबड्या फस्त केल्या व त्यांचे जीवन सार्थकी लावले म्हणा. संध्याकाळी सर्वजण जमलो, अंताक्षरी खेळलो, गप्पाटप्पांचा कार्यक्रम झाला. आता वेळ होती झोपेची, अंगणात मिळेल त्या जागी पथारी पसरली आणि उद्या सकाळी लवकर उठून हरिहरेश्वर जवळ करायची ओढ मनात दाटवली आणि झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जाग आली, सगळ्यांना जागे करून आवरण्यास सुचवले. पाटील काकांनी गरमागरम नास्त्याची व्यवस्था केली, नास्ता उरकला आणि सामानाची बांधाबांध केली. इथून निघताना पाय तर जड झाले होतेच परंतु अवचितपणे मनात कासवांचे दुडूदुडू चालणे एक आत्मिक समाधानाची अनुभूती करून देत होते. सर्वांना पुन्हा नक्की परत येवू असे सांगून गाडीने वेश्वी गावाकडे कूच केले. नदीच्या पलीकडच्या बाजूस हरिहरेश्वरला आम्हास फेरी बोटने जायचे असल्यामुळे आणि गर्दी टाळण्यासाठी केलेली ही धडपड. जेटीवर बोट निघण्यास तयार होती, आम्ही तिकिटे घेतली व गाडीस बोटीवर चढवले. फारतर १० मिनिटांचा हा प्रवास पण एक वेगळाच अनुभव. कोकणात अशा बऱ्याच ठिकाणी फेरी बोट चालतात, मला सर्वात जास्त आवडलेली फेरी बोट म्हणजे जयगड ते तवसाळ दरम्यानची, बोटीच्या चालकाने १५ मिनिटांसाठी ती बोट मला चालवायला दिली होती, अर्थात तो बाजूला उभा होताच. दुसऱ्या बाजूच्या गावात आम्ही उतरलो ते गाव होते, बागमंडले. इथून पुढे ४ किमी अंतर कापून गाडी दक्षिण काशी तीर्थक्षेत्र श्री हरिहरेश्वर इथं पोहोचली. सर्वांनी आवश्यक सामान आणि कॅमेरे बरोबर घेतले व मंदिराकडे प्रस्थान ठेवले.



 मुख्य मंदिर संकुलात दोन वेगवेगळ्या देवतांची मंदिरे आहेत, एक म्हणजे श्री काळभैरवनाथ आणि दुसरे श्री हरेश्वर. माझा वैयक्तिक मंदिरांतील देवांवर विश्वास नसल्याने मी मंदिरात जाणे टाळले, इतर सर्वजण दर्शन घेवून बाहेर आले आणि आम्ही प्रदक्षिणा मार्गावर चालू लागलो. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने एका उंच टेकडीवर जाणारी पायवाट नंतर पायरीमार्गाने समुद्रकिनारी उतरते. तिथून किनाऱ्यावरून चालत आपण परत मंदिरापाशी येतो, हीच ती प्रदक्षिणा. समुद्राला ज्यावेळी भरती आलेली असते त्यावेळी ही प्रदक्षिणा पूर्ण होत नाही, तर ओहोटीच्या दिवशी ती अलगद पूर्ण करता येते. ज्यांना काशीला जायला जमले नाही, त्यांनी जरूर इथं यावे असे म्हणतात. दरम्यानच्या काळात आमच्यातील काही जणांनी प्रदक्षिणा मार्ग टाळून बोटिंग करण्यास निघून गेले, ते डॉल्फिन सफारीपण पाहून आले. आम्ही तोवर समुद्राच्या प्रत्येक एका लाटेसोबत फोटो काढण्याच्या मोह उरकून घेतला. साधारण एक तास कल्ला करून झाल्यावर परतीच्या प्रवासास निघण्याचे ठरले आणि शेवटचे ग्रुप फोटो सेशन उरकून घेवून गाडीने माणगाव कडे प्रस्थान ठेवले. माणगावमध्ये दुपारचे जेवण आणि समारोपाचे दोन शब्द सगळ्यांकडून वधवून घेतले, आणि मग ताम्हिणी घाटमार्गाने आमच्या गाडीने आमच्या कर्मभूमीत प्रवेश ठेवला.

शेवटी,

ससा रे ससा की कापूस जसा,
त्याने कासवाशी पैज लाविली,
बिगी बिगी धावू अन डोंगरावर जावू,
अशी शर्यत रे आपली...

      लहानपणाची आठवण करून देणाऱ्या या ससा आणि कासवांच्या शर्यतीत जिंकतं ते कासवचं! कारण सोप्प आहे, जन्मापासूनच त्याला त्याच्या घराकडे म्हणजेच उद्दिष्टाकडे जाण्याची लागलेली ओढ. ते उद्दिष्ट साध्य करत असताना ते अतिशय संयमितपणे चार पावले चालते आणि डोके वर करून तपासून घेते की माझे लक्ष्य अजून किती दूर आहे. परत चार पावले आणि परत चाचपणी. इथं जर ससा असता तर त्याने धूम ठोकली असती आणि काही अंतर जावून तो थकून गेला असता, आणि ध्येय्यापासून मुकला गेला असता. आपणही म्हणजेच मानव जातीनेसुद्धा कासवाप्रमाणे संयमाने चालत राहिलो, तर आपलीही उद्दिष्टप्राप्ती होईल आणि त्याचा आनंद काही वेगळाच असेल.



      वेळास इथं कासव महोत्सव पाहण्यास आलेल्या आमच्या सदस्यांचे #IndiaTreks तर्फे हार्दिक आभार! लवकरच भेटू अशाच दर्जेदार आणि विषयांकित भटकंती सहित, धन्यवाद!!


आपला,

श्री. अभिजीत शिंदे.
पुणे, महाराष्ट्र.
+९१ ९५२७३३०५६७.

Saturday, March 9, 2019

माझी पहिली हिमालय भेट ... चादर ट्रेकच्या निमित्ताने ...



 सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या व बागडलेल्या आम्हा मावळ्यांना “हिमालय” नेहमीच साद घालत असतो किंवा खुणावत असतो. “हिमालय” म्हणजे आमच्या सह्याद्रीचा मोठा भाऊ बरे! विस्तीर्ण पसरलेली ती पर्वतरांग, शुभ्र बर्फाच्छादित हिमशिखरे, हाडे गोठवणारी बोचरी थंडी, उणे २५ अंश ते उणे ४० अंश तापमान, गोठलेल्या नद्या व त्यांची उगमस्थाने आणि या सर्वांचा तिथल्या स्थानिक लोकांच्या जीवनशैलीवर झालेला त्याचा प्रभाव. हे सर्वच काही अनुभवण्यास मिळाले ते आमचे सह्यगुरु आणि मार्गदर्शक डॉ. श्री. सुनील धुमाळ सरांच्या साथीने, निमित्त मात्र “चादर” ट्रेकचे...

 ट्रेक हा किती गोंडस शब्द आहे ना, सह्याद्रीकरांसाठी? परंतू लेह-लडाख, कारगील आणि झंस्कार परिसरातील लोकांसाठी ते रोजचेच. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये लडाख खोऱ्यात तुफानी बर्फवृष्टी होते आणि परिसरातील लोकांच्या लेह शहराशी जोडणाऱ्या सगळ्या पायवाटा किंवा गाडीवाटा बंद होतात. एकप्रकारे संपूर्ण जीवनमान तथा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री आणि इतर बाजारहाट थांबून जातो. आता यावर काहीतरी उपाय शोधून काढलाच पाहिजे, म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे म्हणून. याच उक्तीचा आधार घेत किमान ४०० वर्षांपूर्वी काही झंस्कारी तरुण-तुर्कांनी लेह शहराशी संपर्क होईल अशी वाट शोधून काढण्याचे ठरविले आणि सुरु झाली शोधमोहीम. बराच काळ काही हातास लागत नव्हते. अशातच झंस्कार नदीचे पाणी गोठलेल्या अवस्थेत दिसले, धाडस करून ते त्या बर्फावर उतरले आणि घसरत का होईना चालण्याचा प्रयत्न करू लागले. ती शुभ्र पांढऱ्या रंगाची बर्फाची लादी सलग होती, बर्फाच्या लादीच्या खालून वाहणाऱ्या पाण्याची खळखळ ऐकू येत होती परंतू लादी तग धरून चालण्याचा आत्मविश्वास देत होती. 


विमानतून घेतलेलं झंस्कार नदीचे छायाचित्र 
लोकं पुढे-पुढे चालत होते, काही ठिकाणी लादी कमीअधिक प्रमाणात तयार होत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. मजल दरमजल करत हे लोक काही आठवड्यांच्या पायपिटीनंतर संगमाच्या ठिकाणी पोहोचले. हा संगम म्हणजेच मानसरोवर हिमशिखरात उगम पावणारी इंडस अर्थात आजची “सिंधू” आणि “झंस्कार” नदीचे मिलन होय. पुढे सिंधू नदी कारगील प्रांतातून होवून सध्याच्या पाकिस्तानात जाते आणि नंतर ती अरबी समुद्राला येवून मिळते. “संगम” पासून पुढे काही तासांच्या समांतर चालीवर लेह शहर वसलेले आहे, जि आजच्या लडाख प्रांताची राजधानी म्हटली जाते. वर उल्लेखिल्या गेलेल्या बर्फाच्या लादीला नंतरच्या काळात “चादर” असे संबोधले गेले. आताच्या काळात पर्यटन आणि साहसी खेळप्रकारात अलगदपणे सामावून जाईल अशी ही तंगडतोड “चादर ट्रेक” नावाने ओळखली जावू लागली आणि जगभरातून लोकं इथं येवून आपल्या शारीरिक क्षमतेचे आकलन करू लागली, आम्हीही त्यातलेच काही...

याच “चादर ट्रेकचा” संपूर्ण थरार मी आपणा सर्वांसाठी ३ अंकात शब्दबद्ध करीत आहे, ते खालीलप्रमाणे...
१.      अंक १ ला – पुणे ते लेह प्रवास, आणि लेह-लडाख दर्शन (३ दिवस).
२.      अंक २ रा – लेह ते नेरेक फॉल्स (संपूर्ण चादर ट्रेकचे ४ दिवस)... आणि
३.      अंक ३ रा – खारदूंग-ला पास व परतीचा प्रवास.

अंक १ ला – पुणे ते लेह प्रवास, आणि लेह-लडाख दर्शन (एकूण ३ दिवस)...

येणेप्रमाणे असे की, आले डॉक्टर साहेबांच्या मना, तेथे कोणाचे काही चालेना... सरांनी सर्वांसमक्ष प्रस्ताव ठेवला की यंदाच्या वर्षीच “चादर ट्रेक” आपल्याला नैसर्गिक अवस्थेत करता येणार आहे, पुढच्या वर्षी तिकडं रस्त्याचे आणि विविध विकासकामांची सुरुवात होणार असल्याने हा ट्रेक राहून जाईल की काय अशी शंका मनात आली. हिमालयाचे आकर्षण मनात होतेच, मी लगोलग होकार सांगितला. मग इतर भिडूंची जमवाजमव चालू झाली, घोळक्यात डॉ. प्रवीण सर, डॉ. सरीताजी, नरेंद्र आणि सचिन सामावले. सर्वेश आणि इतर भिडू बघतो, सांगतो असं म्हणत २ पावले मागे हटले. दिल्लीवरून डॉक्टरांचे काही मित्र आम्हाला येवून मिळणार होते. मग पुढ काय, ट्रेकसाठीचे बुकिंग केले, यावेळी आम्ही Adventure Nation  या संस्थेच्या सहकार्याने ट्रेक करायचे ठरले, त्यांची ट्रेक फी भरली आणि बुकिंग कन्फर्म केले. आता वेळ होती विमान प्रवास बुक करायची, “गो एयर” नामक विमानप्रवास कंपनीची पुणे-दिल्ली आणि दिल्ली-लेह आणि परतीची तिकिटे बुक करून टाकली. आता उत्सुकता आणि आतुरता होती ती जानेवारी महिन्याची आणि हिमालय भेटीची…

आणि तो दिवस उजाडला, दि. २६ जानेवारी २०१९ च्या भल्या पहाटे जाग आली, शुचिर्भूत होवून घराजवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या झेंडावंदन आणि सामुहिक राष्ट्रगीत गायन  कार्यक्रमास हजेरी लावली. एव्हाना दुपार झालेली होती, सहकारी भिडूंना फोन करून कुठवर आलेत याची चौकशी केली. सर्वजण तयार होते. एकत्र येतायेता सायंकाळ झाली अन रात्री ०८:३० च्या सुमारास डॉक्टर साहेब आणि मी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रस्थान केले. विमानतळाच्या आत जावून पहिले फोटोसेशन केले आणि उपलब्ध सर्व सोशल मिडीयावर चादर ट्रेकला निघाल्याचा अपडेट पोस्ट केला. चेक-इन करून मुख्य गेटच्या तिथं पोहोचलो, साधारण १ तासाचा अवधी शिल्लक होता, सर्वजण भुकेने व्याकूळ झालेलो होतोच, चहा आणि नास्त्याची चौकशी केली असता तिथले दर अवाजवी आणि अवास्तव असल्याचे निदर्शनास येताच आठवली ती घरची भाजी-भाकरी. विनाविलंब वरच्या मजल्यावर जावून पथारी पसरली आणि बाजरीची भाकरी, शेंगदाण्याची चटणी, बेसनाची पोळी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, दणकून वढ काढली... माहित होतेच, पुढचे १० ते १२ दिवस आपल्याला आपलं जेवण मिळणार नाही ते. रात्री ११ च्या सुमारास आम्हास घेवून जाणारे विमान आले, आम्ही दंगामस्ती करत-करत आमच्या सीटवर जावून बसलो आणि विमानाने भारताची राजधानी दिल्लीकडे उड्डाण केले.

दोन तास अन पंधरा मिनिटांच्या हवाई सफरीनंतर विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर आगमन केले आणि बसने आम्हास टर्मिनल २ च्याच प्रस्थान कक्षात आणून सोडले. आता दिल्लीत सुमारे ५ तास घालवायचे होते, करायचे काय असा प्रश्न समोर उभा ठाकला. मग आळीपाळीने झोप घ्यायचे ठरले, काही वेळ मी आणि सचिन झोपलो आणि नंतरचा काही वेळ डॉक्टर साहेब आणि मी झोपलो. पहाटे ०५:३० च्या सुमारास जाग आली, आता मात्र एक कप कॉफी प्यावीच अशा उद्देशाने कॉफीच्या दुकानापाशी गेलो आणि सर्वात स्वस्त रु. २४०/- चा कॉफी कप नाईलाजास्तव घेवून डॉक्टर साहेबांनी आणि मी तो शेयर केला. कॉफीचा दर पाहून एकेक्षणी भारत इतका पुढारलेला आहे की काय अशी शंका मनात येवून गेली. परंतू नंतर सावरून स्वत:ला समजावले की हा तो भारत नाही जिथं आपण राहतो, असो... एक कप कॉफीचा दर ४ अमेरिकी डॉलर...
 आता दिल्लीतला मुक्काम आटोपता घेण्याची वेळ आली होती, आम्हास लेहपर्यंत घेवून जाणारे दुसरे विमान सज्ज झालेले होते. वातावरणात धुके पसरले होते, धुके कसले ते “धुरके” होते ते. बहुदा धुरके म्हणजे काय असा प्रश्न पडला असावा, धूर + धुके = धुरके (smoke + fog = smog).  पूर्वेकडून सूर्य डोके वर काढताना अंधुकसा दिसत होता. आमचे विमान प्रवाशांनी भरले, आणि उड्डाणाच्या प्रतीक्षेत रनवे शेजारी जावून थांबले, १५ मिनिटांनी उड्डाणाचा सिग्नल मिळाला आणि विमान लेहकडे झेपावले. साधारण १५ मिनिटांच्या प्रवासानंतर शुभ्र बर्फाच्छादित हिमालयाची विस्तीर्ण पर्वतरांग नजरेस पडू लागली होती. 







वैमानिकाने आजूबाजूच्या रांगांची आणि प्रदेशाची तोकडी का होईना पण माहिती देणे सुरु ठेवले होते. उजव्या बाजूस गोठलेला अनामिक तलाव विमानातून खूपच सुंदर दिसत होता. विमानातून हिमालयाचे विहंगम दृष्य साठवत दीड तासांच्या हवाई सफरीनंतर लेह विमानतळावर उतरण्याची वेळ होती. विमान उतरल्यावर वैमानिकाने बाहेरचे तापमान उणे ७ अंश सेल्शियस असल्याचे सांगितले, विमानतळावरचे कर्मचारी ३ थराचे गरम कपडे घालून आमच्या स्वागतासाठी नाकातोंडातून वाफा काढत सज्ज उभे होते. विमानच्या दरवाजापाशी येताच वैमानिकाशी हस्तांदोलन केले आणि बाहेर पडताक्षणीच तापमानाची चाहूल लागली. संपूर्ण अंग गारठून गेले, पटापट विमानतळाच्या टर्मिनलमध्ये गेलो, सामान घेतले आणि गाडी घेवून लेह शहरात प्रवेश करते झालो.

लेह मधला दिवस १ ला ... नुकतेच शहर जागे झाले होते, मध्येच एके ठिकाणी ड्रायवरने लडाखी नाश्ता करवला, सोबत चहाचे झुरके मारत आम्ही लेहला पोहोचलो असल्याचे अपडेट्स सोशल मिडीयावर टाकून दिले. आता थोडसं थकल्यासारख वाटत होतं पण उत्साह दांडगा होता. आजच्या मुक्कामाचे हॉटेल गाठले, ते हॉटेल नव्हतेच मुळी. ते होते होम स्टे.

 
अगदी घरच्यासारख आदरातिथ्य झालं, पोहोचल्यावर लगेच लडाखी चहा म्हणजेच “कावा” मिळाला. ओळख वगैरे झाली, मन्सूरा दीदीने आमच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण तपासले, ते प्रमाण व्यवस्थित असल्याचे सांगून तिने अगदी हक्काने आजचा दिवस आराम करायचा कुठेही जायचं नाही, असं सांगितल. मग आम्ही काय सामान कोपऱ्यात टाकले आणि रजईमध्ये शिरलो. दुपारच्या वेळी तिने आम्हास अगदी आत्मीयतेने जेवू घातले, सायंकाळी तसेच. आता उद्या काय करायचे असा प्रश्न घेवून आम्ही मन्सूरा दीदीकडे गेलो असता तिने परत सांगितले की आराम करायचा म्हणून. आता मात्र आम्ही साफ नकार दिला आणि किमान लेह शहर आणि परिसर पाहून घेतो अशी विनंती केली. तिने ती लगोलग मान्य केली आणि आमच्यासाठी गाडीची व्यवस्थासुद्धा केली. रात्रीचे जेवण उरकून आम्ही उद्याच्या लेह आणि परिसर सफरीसाठी उत्सुक झालो आणि झोपी गेलो.


लेह मधला दिवस २ रा ... पहिला दिवस झोपून काढल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जाग आली, अर्ध-शुचिर्भूत झालो, आता पुढचे १२ दिवस अंघोळ आणि आम्ही एकमेकांपासून चार हात लांब राहणार होतो. चहा नाश्ता उरकून गाडीमध्ये बसलो आणि लेह परिसराची अद्भुत आणि नयनरम्य सफरीची सुरुवात झाली, आमच्या गाडीचे सारथ्य “रिक्झीन” नावाच्या लडाखी तरुणाकडे होते. मन्सुरा दीदीने दिवसाचा कार्यक्रम दिला होता, पहिले ठिकसे मॉनेस्टरी, शेय महाल, सिंधू नदीचे पात्र, हॉल ऑफ फेम हे मिलिटरी संग्रहालय आणि शेवटी शांती स्तूपा आणि नंतर हॉटेलमध्ये मुक्काम…

ठिकसे मॉनेस्ट्री मधला बुद्ध!!
थोडेसे लडाख प्रांताविषयी...

भौगोलिक दृष्ट्या जम्मू आणि काश्मीर राज्य मुख्यत्वे करून तीन प्रांतात विभागले गेलेलं आहे.
१.      जम्मू – जम्मू प्रांताच्या राजधानीचे शहर जम्मू होय.
२.      काश्मीर – काश्मीर प्रांताच्या राजधानीचे शहर श्रीनगर होय.
३.      लडाख – लडाख प्रांताच्या राजधानीचे शहर लेह होय.

लडाख प्रांताची ओळख हिमालयातील उंचच उंच शिखरांचा आणि एका शिखरावरून दुसऱ्या शिखराकडे जाण्यासाठीच्या नैसर्गिक खिंडीचा (पासेस) प्रदेश अशी सांगता येईल. जगातील सर्वात उंचीवरचा वाहन चालवत घेवून जाऊ शकू असा पास “खारदूंग-ला” याच प्रदेशात येतो. या पासची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे १८३८० फूट इतकी आहे. लडाख प्रांतातील इतर पासेसची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे...

१.      झोजी-ला – सुमारे ४३४ किमी लांबीचा लेह-श्रीनगर हमरस्ता झोजी-ला पास मधून जातो. या पासची उंची समुद्र सपाटीपासून ११५७० फूट इतकी असून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इथं भरपूर प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि इथली वाहतूक बंद होते. हा पास जून ते सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला असतो.
२.      रोहतांग-पास - सुमारे ४५० किमी लांबीचा मनाली-लेह हमरस्ता रोहतांग-पास मधून जातो. या पासची उंची समुद्र सपाटीपासून १३०५१ फूट इतकी असून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इथं भरपूर प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि इथली वाहतूक बंद होते. हा पास जुलै ते सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला असतो. रोहतांग-पास जगातील सर्वात जास्त सुंदर पासेसपैकी एक आहे.
३.      बारलाचा-पास - मनाली-लेह हमरस्त्यावरील अजून एक असलेला हा पास समुद्र सपाटीपासून १६०४० फूट इतक्या उंचीवर असून तीन रस्ते इथं एकत्र येतात. पहिला रस्ता मनाली, दुसरा लेह आणि तिसरा स्पितीवरून येणारा.
४.      खारदूंग-ला – लेह पासून उत्तरेकडे ४० किमी अंतरावर स्थित खारदूंग-ला पास जगातील सर्वात उंचीवरचा वाहन चालवत घेवून जाऊ शकू असा पास मानला जातो. या पासची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे १८३८० फूट इतकी आहे. हा पास लेह शहर आणि सियाचीन ग्लेसियरला जोडतो. सियाचीनची म्हणजे जगातील सर्वात उंचीवरची समरभूमी किंवा युद्धभूमी होय. 
५.      चांग-ला – मराठीतील चांगला पण वास्तवात देखील चांगला, सुंदर असा हा पास लेह आणि पंगोंग-त्सो रस्त्यावर स्थित असून या पासची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे १७५९० फूट इतकी आहे. चांग-ला पास जगातील सर्वात उंचीवरचा वाहन चालवत घेवून जाऊ शकू असा खारदुंग-ला नंतरचा एक पास मानला जातो. 
६.      नामिका-ला – सुमारे १२१४० फूट उंचीवरील हा पास झंस्कार आणि कारगील परिसराला जोडतो. हा पास झंस्कार परिसरात येतो. झंस्कार परिसरात अजून फोटू-ला आणि लाचूलुंग-ला हे पास येतात जे अनुक्रमे १३४७८ फूट आणि १६५९८ फूट उंचीवर स्थित आहेत.

लडाख परिसरातील पर्वतरांगा... 
१.      द ग्रेट हिमालय रेंज – हिमालयाची विस्तीर्ण पर्वतरांग भारत आणि बाकी आशियाई देशांना विभक्त करते जसे की नेपाळ, भूतान, चीन आणि पाकिस्तान. हिमालयाच्या याच पर्वतरांगेत ३० पेक्षाही जास्त जगातील उंचच उंच शिखरे आहेत जसे की “एवरेस्ट” आणि “कांचनजंगा” जे आज नेपाळच्या हद्दीत आहेत. 
२.      द झंस्कार रेंज – उत्तरेकडील बाजूच्या हिमालयाची ही उपरांग लडाखचा पाठीचा कणा असून लामायुरूपर्यंत पश्चिमेकडे आणि झंस्कारपर्यंत पसरलेली आहे. मुख्यत: ही रांग आपणास झंस्कार नदीच्या अस्तित्वाने आणि तिच्या सौंदर्याने ओळखीस पडते आणि ती दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते व अंतत: सिंधू नदीस येवून मिळते. 
३.      द लडाख रेंज – हिमालयाची एक अंतर्गत उपरांग लडाख जी लेह शहराच्या उत्तरेकडे असून ती तिबेटमधील कैलाश पर्वत रांगेत लुप्त होते. याच रांगेत जगातील सर्वोच्च उंचीवरील वाहन चालवण्यास योग्य असा बहूप्रसिद्ध पास आहे ज्याच नाव आहे “खारदुंग-ला”.
४.      द काराकोरम रेंज – अक्साई-चिन ते गिलगीट पर्यंत पसरलेली सुमारे ५०० किमी लांबीची ही रांग सुमारे ८०% टक्के आजच्या पाकिस्तानात आहे. या रांगेत किमान ६० उंच शिखरे आहेत ज्यांची उंची सुमारे २३००० फूट इतकी आहे. याच रांगेत जगातील दुसरे उंच शिखर के-२ स्थित आहे ज्याची उंची २८२५१ फूट आहे.

गाडीत बसलो आणि लेहच्या सफरीवर निघालो, लेह शहरातून गाडीने मनाली हमरस्त्याने पूर्वेकडे प्रस्थान सोडले. २० किमी अंतरावर पोहोचल्यावर आम्ही “ठिकसे मॉनेस्टरी” इथं पोहोचलो. इथल्या गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर बसून अध्यात्मिक आणि आत्मिक मन:शांतीचा अनुभव घेतला आणि रणछोडदास चांचडच्या ३ इडियटस या चित्रपटातील शाळेला भेट दिली, ही शाळा कडाक्याच्या हिवाळ्यात बंद ठेवली जाते. ही शाळा पाहून आम्ही त्याच इडियट लोकांना अनुभवले आणि परतीचा प्रवास चालू केला. आजच्या दिवसाचं तिसर स्थळ म्हणजे “शेय महाल”, बौद्ध समाजाचे समाज मंदिर असलेलं हे ठिकाण आहे, इथं येवून बौद्ध प्रार्थनेस उपस्थिती लावली आणि लेह शहराकडे प्रस्थान ठेवले. वाटेत एके ठिकाणी थांबून चहाचे झुरके मारले. अगदीच काही अंतरावर रिक्झीनने गाडी थांबवली आणि आम्हास सिंधू नदी जी लडाख प्रांतात इंडस नावाने ओळखली जाते तिचे छोटेखानी पात्र दाखवले. सिंधू नदीचा उगम तिबेटमधील कैलाश पर्वतावर होतो आणि ती दक्षिणोत्तर वाहते आणि लेह शहरापासून पुढे जात ती झंस्कार आणि इतर उपनद्यांना आपल्या कवेत घेवून कारगील प्रांतातून पुढे जात सिंध-पाकिस्तानात जाते व तिथला प्रदेश सुजलाम सुफलाम करते. याच प्रदेशाला सिंधप्रांत संबोधले जाते.

 
      सिंधू नदीच्या पात्रात काही वेळ घालवल्यावर आता वेळ होती ती थोड्याशा का होईना पोटपूजेची. तडक लेह शहर गाठले आणि लडाख स्पेशल हॉटेलमध्ये शिरलो व ऑर्डर केला “थुक्पा” आणि “मटण मोमो’ज”. थुक्पा म्हणजे चिकनचे सूप आणि त्यात शिजवलेल्या नुडल्स त्याही लडाख स्पेशल मसाल्यांमध्ये, अहाहा. खरंच सुंदर थुक्प्याचे झुरके घेत मोमो खाल्ले आणि सैन्य दलातील शहिदांच्या स्मरणार्थ उभारलेल्या सुंदर अशा “हॉल ऑफ फेम” कडे प्रस्थान ठेवले. 

लेहपासून ३ किमी श्रीनगर रस्तावर स्थित हे स्मृतीस्थळ आपणास आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी जीव दिलेल्या सैनिकांच्या शहादतीची आठवण करून देतो आणि आपणास एक जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा देते. तसेच सैन्यदलातील लोकांनी तयार केलेल्या सुंदर वस्तू इथं ना नफा ना तोटा तत्वावर विकल्या जातात त्याही शॉपिंग कॉम्प्लेक्सला भेट दिली. इथं काही वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरला नाही, कारण जे पैसे आम्ही खर्च करणार होतो ते थेट सैन्यदलाच्या उपयोगी पडणार होते याचा एक विलक्षण आनंद मनात होता.
हॉल ऑफ फेम येथील दिव्यज्योत 
 



      देशासाठी बलिदान दिलेल्या अनेक सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची विस्तृत माहिती आणि त्यांनी केलेला पराक्रम इथं शब्दशः मांडण्यात आलेला आहे, सियाचीन युद्धभूमीत आपले सैनिक कशा प्रकारे निसर्गाशी दोन हात करून भारतीय सीमेचे रक्षण करतात हेही इथं दाखवलेलं आहे. सारं काही सामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे, समस्त भारतीय सेनेला त्रिवार मुजरा!!

      आता आजच्या दिवसाचे शेवटचे स्थळदर्शन बाकी होते ते म्हणजे “शांती स्तूपा”... मराठीमध्ये आत्मिक आणि अध्यात्मिक शांतीचा अनुभव देणारी अनेक ठिकाणे लडाख परिसरात आहेत, त्यापैकीच एक शांती स्तूपा. लेह शहराच्या उत्तरेकडील एका टेकडीवर बृहद मोठे हे बौद्ध धार्मिक स्थळ आहे, शुभ्र पांढऱ्या रंगात रंगवलेले, अधेमध्ये सोनेरी छटा, कळसाचा रंग सोनेरी आणि खरोखर अद्भुत. एक गोष्ट ट=इथं मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इथला बहुसंख्य समाज हा बौद्ध आहे आणि उरलेला मुस्लीम! सांख्यिक गणतीत मोजायचे झाल्यास ८०% बौद्ध आणि २०% मुस्लीम असे ते गणित. दोन्ही समाज शांतीप्रिय, कुठल्याही प्रकारचा दंगा-धोपा, भांडणतंटा नाही, जमिनीचे वाद नाहीत एकूणच तथागत गौतम बुद्धाच्या शांती तत्वज्ञानाचे खरेखुरे शिष्य. काही अपवाद वगळता, इथं दोन्ही समाजांमध्ये आपापसांत लग्नेही होतात असे कळले, हे ऐकताच मला आमच्या पुरोगामी महाराष्ट्राची आठवण झाली आणि “सैराट” आठवला, काय ते पुरोगामित्व!! असो, टीका करायची तर ती इतर कुठही करता येईल.

शांतीस्तूपा
       शांती स्तूपा पाहून झाल्यावर त्या संकुलाच्या तटबंदीवरील एका दिशादर्शक बाणाने लक्ष वेधले, तो होता “खारदुंग-ला”. मनोमन तिकडे जाण्याचा निश्चय केला अन तडक हॉटेल गाठले आणि रजईच्या आता स्वता:ला झोकून दिले ते सायंकाळचे ६ कधी वाजून गेले काही कळलेच नाही. संध्याकाळचे छोटेखानी जेवण घेवून निद्रादेवीस अधीन झालो.

लेह मधला दिवस ३ रा ... दुसरा दिवस संपूर्ण सार्थकी लावल्याच्या आनंदात सकाळी उशिरा उठलो. चहा, नाश्ता उरकून घेतला आणि खोलीच्या बाहेर पडतो तो काय, माझ्या आयुष्यातील पहिलीवहिली बर्फवृष्टी पाहण्याचा योग आला, निसर्गाने जणू हा आमच्यासाठीच योजून ठेवलेला सोहळा. छोटेछोटे बर्फाचे कण आकाशातून जमिनीकडे हळुवारपणे बरसत होते आणि पायाखालची जमीन संपूर्ण बर्फाच्या चादरीखाली लपलेली दिसली. याच बर्फवृष्टीचा आनंद घेत “चादर ट्रेक” साठी आलेल्या इतर  भिडूंची ओळख करून घेतली. आता वेळ होती ती चादर ट्रेक हा नेमका काय आहे ते समजून घेण्याची आणि त्यासाठी पाचारण केले गेले कृष्णा आणि त्याच्या टीमला. एकंदरीत तिशीतला कृष्णा हा मूळ व्यवसायाने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मान्यताप्राप्त अभियंता, हैदराबादेतील एका उच्चभ्रू कुटुंबात वाढलेला हा एक अतिशहाणा म्हणावा असा एक मुलगा, चांगल्या पगाराची नोकरी सोडून ट्रेकच्या क्षेत्रात उतरलेला. या क्षेत्राचे उत्पन्न हे निमित्तमात्र असते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आम्हास रणछोडदास चांचड भेटला होता. चादर ट्रेकचा किमान ८ ते १० वेळचा रग्गड अनुभव गाठीशी असलेली ही टीम आमची मार्गदर्शक होणार होती. सलग दोन तास चाललेलं हे मार्गदर्शन शिबीर शेवटी शेवटी रटाळवाण वाटायला लागलेल होतं परंतु तितकचं उपयुक्त देखील. शिबीर संपवून तीच टीम आम्हाला लेह शहरात फिरायला घेवून गेली. मार्केटमधे आम्ही फ्लीस, हातमोजे आणि कानटोप्या खरेदी केल्या, सोबत मिलिटरी स्वेटरसुद्धा!! दुपारच्या जेवणात चाओमीन राईस आणि सूप घेतलं. बऱ्यापैकी सगळ्या वस्तूंची खरेदी करून एकमेकांशी विचारपूस करून परतण्याचे ठरविले. अर्ध्या तासाच्या कंटाळवाण्या चालीने हॉटेलमध्ये परतलो, आणि आराम केला.

      सायंकाळी अनपेक्षितपणे दिल्लीच्या ग्रुपमधील मलिक भाईचा वाढदिवस साजरा केला. तुफान दंगामस्तीने आणि कॅम्पफायरने वातावरण भरून गेलं होतं. रात्री उशिरा पार्टी आवरली आणि उद्याच्या दिवशी चादरसाठी प्रस्थान ठेवण्याच्या ओढीने म्हणा किंवा उत्सुकता मनात साठवून झोपी गेलो.


अंक २ रा – लेह ते नेरेक फॉल्स (संपूर्ण चादर ट्रेकचे ४ दिवस)


क्रमश: लवकरच  ...
To see all the photos, please click the Google photos link below... 

https://photos.app.goo.gl/XLrZtgHjQA3h3oHw5